महात्मा फुलेंची बदनामी का होते?

सह्याद्रीबाणा.कॉम चे प्रकाश पोळ यांचा महात्मा फुलेंची बदनामी का होते हे सांगणारा लेख

महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. बळीराजा आणि इतर असुर हे आमचे खरे पूर्वज आहेत हे सत्य महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सबळ बनवून ब्राम्हणी वर्चस्वाला खिंडार पाडले. बहुजनांचे खरे महानायक आणि त्यांचे खरे स्वरूप फुलेंनीच समजावून सांगितले.

परंतु काही समाजविघातक ब्राम्हणी प्रवृत्ती महात्मा फुलेंच्या महात्म्यावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. अर्थात कावळ्यांच्या शापाने गाय जरी मरत नसली तरी ब्राम्हणी अपप्रचाराने भावी काळात बहुजन समाजाच्या सर्वश्रेष्ठ महामानवांचा इतिहास काळवंडला जाण्याची शक्यता आहे. महात्मा फुलेंचे मोठेपण एवढे आहे की कोणत्याही अपप्रवृत्तींनी त्यांच्या बद्दल कितीही अपप्रचार केला, गैरसमज निर्माण केले तरी महात्मा फुलेंचे मोठेपण तसूभरही कमी होत नाही. परंतु एखाद्या प्रश्नावर बहुजन समाज गप्प राहिला तर ब्राम्हण वाटेल तसा विकृत इतिहास निर्माण करतात आणि शे-दीडशे वर्षांनी तोच इतिहास खरा म्हणून आमच्या माथी मारला जातो. त्यासाठी या ब्राम्हणी प्रवृत्तींना चोख उत्तर देणे गरजेचे आहे.

महात्मा फुलेंनी त्यांच्या ग्रंथात ब्राम्हणी देव-देवतांचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर गंभीर स्वरूपाचा असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. प्रसंगी चिरफाड ही करावी लागते, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या समाजाला लागलेला जातिभेदाचा रोग इतका गंभीर आहे की त्या रोगाने आमच्या हजारो पिढ्या बरबाद केल्या. एखाद्या अनुवांशिक रोगाप्रमाणे हा रोगही एका पिढीतून दुसर्‍या पिढीत संक्रमित होत आहे. अशा वेळी किरकोळ उपाय करून भागणार नाही तर त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार हे समाजशास्त्राचे डॉक्टर महात्मा फुलेंनी ओळखले. त्यासाठी त्यांनी ब्राम्हणी गुलामगिरीच्या मुळावरच घाव घातला. ज्या धर्म ग्रंथांच्या आधारे ब्राम्हणांनी आजपर्यंत बहुजन समाजाला गुलामीत ठेवले त्या धर्मग्रंथांनाच फुल्यांनी लक्ष बनवले. धर्म ग्रंथातील थोतांड, अवतार कल्पना यांची चिरफाड केली. इतकी केली की ब्राम्हणांना कुठे कुठे सावरावे तेच कळेना झाले. महात्मा फुलेंनी समाजाला सत्यशोधनाची दिशा दिली. समाजाच्या हलाखीचे मूळ जे गोडबोल्या ब्राम्हणांच्या धर्मग्रंथात आहे ते दाखवले आणि चिकित्सक इतिहास समाजासमोर ठेवला.

समाजाने महात्मा फुले स्वीकारले आणि ब्राम्हणी गुलामगिरी झुगारून दिली. आजपर्यंत वर्चस्वाची चटक लागलेल्या ब्राम्हणांना महात्मा फुलेंचा हा हल्ला सहन झाला नाही. पण ते काहीही करू शकत नव्हते. कारण महात्मा फुलेंच्या सत्यशोधक आंदोलनाची धग इतकी प्रखर होती की ब्राम्हणी वर्चस्ववाद त्यात होरपळून निघाला. त्यामुळे हुशार ब्राम्हणांनी एक ओळखले ते म्हणजे महात्मा फुलेंची क्रांती आपण सहजासहजी थांबवू शकत नाही. जर त्यांच्या क्रांतीला आणि समाजजागृतीला लगाम घालायचा असेल तर महात्मा फुलेंनी ब्राम्हणांवर टीका केली, देवाला-धर्माला विरोध केला अशी मांडणी करून चालणार नाही. त्यासाठी महात्मा फुलेंना बदनाम केले पाहिजे. पण कसे ? महात्मा फुलेंचा, त्यांच्या विचारांचा बहुजन समाजावर इतका प्रभाव आहे की बहुजन समाज सहजासहजी फुलेंना नाकारणार नाही. मग त्यांनी शक्कल लढवली. महात्मा फुलेंनी शिवरायांना विरोध केला. शिवरायांना शिव्या दिल्या.. किती मोठे संशोधन.. चला एकदा हा जावईशोध लागलाच आहे तर समाजासमोर मांडायला हवा. निदान शिवरायांवर प्रेम करणारा बहुजन समाज तरी फुलेंना नाकारेल. त्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करण्यात आले. महात्मा फुलेंच्या इतर कोणत्याही गोष्टीना बहुजन समाज विरोध करत नाही ना.. मग आता बघुया, शिवरायांचा अपमान बहुजन कसा सहन करतात ते! त्यासाठी बर्‍याच पातळीवर महात्मा फुलेंची बदनामी सुरु केली. महात्मा फुले शिवरायांना निरक्षर म्हणतात, लुटारू म्हणतात असे गैरसमज पसरवायला सुरुवात केली.

मागे सोबत या नियतकालिकातून डॉ. बाळ गांगल यांनी ही महात्मा फुलेंविषयी असभ्य लिखाण करून “शिवरायांना शिव्या देणार्‍या या महात्म्याला महात्मा कसे म्हणावे ?” असा प्रश्न उपस्थित केला होता. डॉ. गांगल ८ लेखांची लेखमाला या विषयावर लिहिणार होते. परंतु २ लेख लिहिल्यानंतर महाराष्ट्रात जो जनक्षोभ उसळला त्यामुळे डॉ. गांगल आणि सोबतकार यांना जाहीर माफी मागावी लागली. त्यांनी उर्वरित लेखही रद्द केले. आत्ताही काही दीड दमडीच्या भटांनी आणि त्यांच्या दलालांनी महात्मा फुलेंची बदनामी फेसबुक वरून सुरु केली आहे. ब्राम्हण आपले डावपेच बदलतात मात्र ध्येय बदलत नाहीत. एखाद्या पातळीवर अपयश आले तरी काही काळ गप्प बसतात. त्यावेळची त्यांची शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता असते. कारण त्या शांततेनंतर प्रतीक्रांतीचे वादळ घोंगावू लागते. त्या प्रतीक्रांतीच्या वादळात बहुजन समाजाने आपला स्वाभिमान आणि गौरवशाली इतिहास हरवू नये यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच महात्मा फुले किंवा इतर बहुजन महामानवांची बदनामी आणि विकृत इतिहास रोखण्यासाठी लेखणी झिजवली पाहिजे.

संपूर्ण बहुजन समाजाच्या मनात ज्या शिवरायांबद्दल आदर आणि अभिमान आहे त्यांचा खरा इतिहास सर्वप्रथम महात्मा फुलेंनीच समोर आणला. महात्मा फुले यांची शिवरायांवर अतोनात श्रद्धा होती. त्यांनीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढून पहिली ‘शिवजयंती’ साजरी केली. त्यावेळी तेथील ग्रामभटाने मात्र पूजेची फुले लाथेने उडवून शिवराय आणि महात्मा फुलेंचा उपमर्द केला. शिवरायांचे खरे चरित्र प्रथम महात्मा फुलेंनीच लिहिले. शिवरायांचा पोवाडा लिहून खरे शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक नव्हे तर कुळवाडी कुळभूषण होते हे सत्य फुलेंनीच सर्वप्रथम मांडले. महात्मा फुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार. शिवाजी महाराजांना ते कमी लेखत नव्हते. किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठत्व त्यांच्या साहित्यात दिसून येते. आज शिवराय हे निरक्षर नव्हते याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महात्मा फुलेना कोणताही दोष लागत नाही. आज महात्मा फुले हयात नाहीत. ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भूमिकेत निश्चितच बदल केला असता. किंबहुना त्यांना या गोष्टीचा खूप आनंदच झाला असता. महात्मा फुले हे खरे शिवभक्त होते.

जे ब्राम्हण महात्मा फुलेंच्या सत्यशोधक कार्यावर टीका करतात त्यांचे खरे दुखणे हे आहे की महात्मा फुलेंनी ब्राम्हणांवर खूप टीका केली, ब्राम्हणी वर्चस्ववाद गाडून टाकला. त्यांना माझा सवाल आहे आपल्या मनातली जातीवर्चस्वाची झापडे दूर केली असती तर ब्राम्हणांनी शिवरायांना किती त्रास दिला तेही आपणाला दिसले असते.. पण तुम्हाला ते दिसत नाही. तुम्हाला प्रश्न पडतो की फुलेंना महात्मा कसे म्हणायचे.. कारण त्यांनी आयुष्यभर ब्राम्हणावर टीका केली..पण त्यांनी जे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते त्यात येणार्‍या सर्व स्त्रिया ब्राम्हण होत्या..जर ते ब्राम्हणांचा द्वेष करत होते तर त्यांनी ब्राम्हण स्त्रियांची अत्याचारातून किंवा फसवणुकीतून जन्माला आलेली मुले का सांभाळली..? का त्या ब्राम्हण भगिनींना आधार दिला..? त्यावेळी कोणता ब्राम्हण या भगिनींवरील अन्यायाविरुद्ध उभा राहिला..? तुम्हाला महात्मा फुलेंचे हे गुण दिसत नाहीत, दिसणार नाहीत.. महात्मा फुलेंनी ब्राम्हण विधवेचा मुलगा दत्तक घेवून त्याला सांभाळला, त्याला डॉक्टर केले, ते का तुम्हाला दिसत नाही..?

डॉ. गांगल यांनी त्या दोन लेखांमधून महात्मा फुलेंविषयी जे प्रश्न उपस्थित केले गेले त्याला उत्तर म्हणून हरी नरके यांनी “महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन” हे पुस्तक लिहिले आहे. अभ्यासू आणि जिज्ञासूंनी ते पुस्तक मिळवून वाचावे. जर आपले मन निर्मळ, निष्कपट असेल तर महात्मा फुलेंची थोरवी आपणास पटल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी जातीचा निरर्थक अहंकार आपणास दूर ठेवावा लागेल.

-प्रकाश पोळ
सह्याद्रीबाणा

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.